जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्हा खानदेश समजला जातो. सांस्कृतिकदृष्ट्या हा भाग समृद्ध समजला जातो. या प्रदेशातील बोली अहिराणीला प्राचीन परंपरा आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांनी अहिराणी भाषेला सन्मान मिळवून दिला. या बोलीभाषेच्या समृद्धीत भर घातली ती लतिका चौधरी यांच्या साहित्याने. धुळे आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या त्यांच्या कार्यक्रमाचे लिखित स्वरूप म्हणजे ‘खान्देशी....बावनकशी..!’ हे पुस्तक होय.
खानदेशातील ग्रामीण जीवनाशी निगडित अनेक गोष्टी त्यांच्या लेखनात येतात. गावगाडा, नात्यागोत्यांचे प्रतिबिंब यात पडले आहे. रूढी-परंपरेत अडकलेली ग्रामीण स्त्री-समाजातील बदलत्या प्रवाहाशी जुळवून घेते हे यातून दिसते. म्हणूनच अनिष्ट परंपरांवर त्या हलक्या-फुलक्या शब्दांत प्रहर करतात.
देवधर्माच्या नावाखाली भक्तांना फसविणारे भोंदूबाबा, श्रावणातील व्रताची जीवनातील गोष्टींशी सांगड, मजहब, लोकशाहीचा खरा अर्थ, विविध धर्मातील एकोपा, गंडेदोरे करण्यापेक्षा स्वच्छतेकडे लक्ष देणे आदी ३५ प्रकरणांमधून सामाजिक जाणिवांविषयीचे अहिराणी भाषेतील लिखाण यातून वाचायला मिळते.
पुस्तक : खान्देशी....बावनकशी..!
लेखक : लतिका चौधरी
प्रकाशक : दिशोत्तमा प्रकाशन
पाने : १५५
किंमत : १५० रुपये
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)